या संकेतस्थळास भेट देणाऱ्या शिक्षक,विद्यार्थी,पालक व सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत..!

Monday, 16 August 2021

ऑनलाईन शिक्षण : अडथळ्यांची शर्यत

शिवाजी कराळे,सहशिक्षक कें.प्रा.शा.ब्रँच मुखेड

             सध्यस्थितीत जग कोविड सारख्या विश्वव्यापी नैसर्गिक आपत्तीशी झुंजत आहे.अनेक देशांच्या अर्थव्यवस्था व जीडीपी-विकास दर उद्धवस्त करणाऱ्या या संकटाने अपरिमित हानी झाली ती शिक्षणक्षेत्राची.“ युद्ध,आणीबाणी, साथीचे रोग अथवा नैसर्गिक आपत्ती या सारख्या कोणत्याही संकटाचा सर्वाधिक वाईट परिणाम बालकांवर होत असतो.” युनीसेफचे भारतातील प्रतिनिधी यास्मिन अली हक यांचे हे म्हणणे किती बोलके आहे हे त्यांच्या विधानावरून आपल्या लक्षात येते.एका अभ्यासानुसार कोविड-19 मुळे आज देशातील 15 लाख शाळा बंद आहेत.प्राथमिक व माध्यमिकचे एकूण 28 कोटी 60 लाख तर कोविडपूर्वीचे 60 लाख विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असून त्यात 49% मुलींचा समावेश आहे. फक्त 24% भारतीय घरांमध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी इंटरनेट जोडणी आहे.त्यातही शहरी व ग्रामीण भागातील दरी खूप मोठी आहे.लॉकडाऊन नंतर सधन व शहरी भागातील शाळा,पालकांनी ऑनलाईन मार्गाचा अवलंब केला. त्यांच्यासोबत ज्यांची या ऑनलाईन तंत्राशी नाळ जुडली नाही,ज्यांनी शाळेचे तोंडही पाहिले नाही त्यांचेही शिक्षण झाल्याचे प्रमाणपत्र देऊन त्यांना सरसकट पुढच्या वर्गात पाठवण्यात आले.दूरशिक्षणासाठी वंचित कुटुंबे झगडत आहेत.गरीब विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, असतील तर इंटरनेट नाही.एका कुटुंबात एक फोन अन अनेक पाल्य अशीही अवस्था पहावयास मिळत आहे.ज्यांच्याकडे वरीलपैकी काहीच नाही,घरात शैक्षणिक वातावरण नाही,पालक रोज मजुरीला जातात तसेच सतत स्थलांतरित होत असलेल्या पालकांच्या शिक्षणाबाबत तर न बोललेलेच बरे ! अश्या स्थितीत मुलांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत काय बोलावे ?

             शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवणे हे शिक्षण व्यवस्थेपुढील मोठे आव्हान आहे.त्यातून सहज सोपा मार्ग म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला.यातही पदोपदी असंख्य अडथळे आहेतच.राज्यभरात ऑनलाईन शिक्षणाबाबत एकवाक्यता किंवा समन्वयाचा अभाव आढळून येतो.असंख्य विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही ही तंत्रे वापरण्याबाबतचे ज्ञान अवगत नाही.योग्य साधनसामुग्री,अभ्यासक्रमाऐवजी असंबद्ध व्हिडिओ,सैरभर साहित्याचा मारा,मनात येतील तसे उपक्रम,मातृभाषेतील दर्जेदार साहित्याचा अभाव,चुकीचा आशय,उत्तम प्रतीच्या दूरदर्शनच्या शैक्षणिक वाहिन्यांचा अभाव कायमचा राहत आलेला आहे.सर्वत्र उद्दिष्ट्यहीन प्रयत्न होताना दिसत आहेत.खाजगी व सरकारी शाळेतील  भौतिक सुविधामधील दरी आपल्याला अद्यापही कमी करता आली नाही.कमी उत्पन्न गटातील पालकांना कोविडमुळे शाळा बंद असूनही अनेक शाळांनी संपूर्ण फि वसुलीसाठी तगादा लावलेला असल्याने शाळा विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे.अनेक विद्यार्थ्यांना फी न भरल्यामुळे ऑनलाईन वर्गात प्रवेश दिला जात नाही. लॉकडाऊनमुळे रोजगार,कामधंदा बंद झालेला असताना पाल्यांच्या शाळेची फीस भरावी,त्यांच्यासाठी स्मार्टफोन विकत घ्यावा की पोटापाण्याचा प्रश्न सोडवावा अश्या कात्रीत गरीब व  सामान्य कुटुंबातील असंख्य पालक सापडले आहेत.याबाबत शासन स्तरावर कसल्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही किंवा धोरण निश्चिती केली जात नाहीही शोकांतिका आहे.घरची परिस्थिती नसल्यामुळे किंवा शैक्षणिक वातावरण नसल्याने कायम वसतिगृहात राहून शिकणाऱ्या विधवा पालक असलेल्या व अनाथ  मुलांची शैक्षणिक परिस्थिती आणखीच बिकटच आहे.ते ना ऑनलाईन ना ऑफलाईन शिक्षणप्रवाहात आहेत.मागील दोन वर्षापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र कधी सुरु होईल ? याबाबत ही अनिश्चितता कायम आहे.

             ऑनलाईन शिक्षणासाठी बीडमधील मुलाची आत्महत्या,मोबाईल घेण्यासाठी पालकांनी घरातील गाय-म्हैस यांची केलेली विक्री,सिंधूदुर्ग मधील स्वप्नाली सुतार या विद्यार्थिनीला नेटवर्क नाही म्हणून डोंगरमाथ्यावर जाऊन अभ्यास करावा लागणे या घटना सामान्य कुटुंबातील मुलांची होणारी शैक्षणिक परवड दर्शवणाऱ्या आहेतच त्याशिवाय ऑनलाईन शिक्षणातील अडथळ्यांची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.शाळा किंवा शिक्षण बंद असल्याने मुलींच्या शिक्षणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.थोडीफार सुविधा उपलब्ध असली तरी त्यात मुलांना प्राधान्य मिळते.मग शिक्षणाऐवजी मुलींची कमी वयात लग्न करून जबाबदारीतून मुक्त होणाऱ्या पालकांचीही संख्या कमी नाही.प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात याहूनही अधिक दाहक अनुभव व वास्तविकता आपल्याला अनुभवता येईल.आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना जसे धान्य दिले,तसेच घरातील बालकांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी साधने मात्र अजूनही पोहोचली नाहीत.पहिल्या लाटेत असलेली अवस्था तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असतानाही तशीच आहे हे पाहता प्राधान्यक्रम कशाला ? हा प्रश्न उपस्थित होतो.या अडथळ्यांची दखल घेऊन ही असमान गटातील शर्यत व त्यातील अडथळे दूर करून एकसमान पातळीवर आणण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करणे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अत्यावश्यक आहे.उर्वरित 76% मुले ज्यांची साधनांच्या अभावामुळे निर्माण झालेली दोन असमान क्षेत्रातील शर्यत ही शिक्षण व्यवस्थेतील खरी अडथळ्यांची शर्यत आहे.ज्यामुळे अहिरे-नाहीरे यांच्यातील दरी मिटण्याऐवजी अधिक गडद होण्याचीच शक्यता अधिक आहे.कोरोनामुळे निर्माण झालेली ही दरी भविष्यात अनेक विद्यार्थ्यांचे जीवन सुकर करण्याऐवजी समस्या व आव्हाने निर्माण केल्याशिवाय राहणार नाही.कोरोनाने जसे आरोग्याचे प्रश्न निर्माण केले त्यापेक्षा भयावह प्रश्न बालकांच्या शिक्षणाबाबत निर्माण केले आहेत.याबाबत जागरूकतेने प्रयत्न केले नाहीत तर ही मुले शिक्षणप्रवाहाच्या बाहेर गेल्यानंतर त्यांच्या आयुष्याची दिशा कशी असेल ? हा प्रश्न संवेदनशील मनाला सतत अस्वस्थ करत राहणार हे निश्चित. 

No comments:

Post a Comment