या संकेतस्थळास भेट देणाऱ्या शिक्षक,विद्यार्थी,पालक व सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत..!

Monday, 16 August 2021

 

प्रशासनातील असंख्य ‘दिपाली चव्हाण’ यांच्या छळाचे काय ?

(शिवाजी कराळे,अध्यक्ष अखिल म.प्रा.शि.संघ,मुखेड)

          मार्च महिन्यात महिला दिनाच्या पूर्वसंध्येला भंडारा जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी शीतल फाळके यांनी गळफास लावून आत्महत्या केली आणि महिन्याच्या शेवटी अमरावती जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण या महिला अधिकाऱ्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.या दोन्ही आत्महत्येतील साम्य म्हणजे त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचा होत असलेला छळ,आर्थिक पिळवणूक आणि अपमानास्पद वागणूक होय.या दोन्ही अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने आपले जीवन संपवावे लागणे अतिशय वेदनादायी तर आहेच पण त्यापेक्षा प्रचंड चीड आणणारे आणि संतापजनक आहे.

          खरे म्हणजे मूकपणे बळी जाणाऱ्या अशा अनेक महिला कर्मचारी-अधिकारी यांचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. यापूर्वीही ‘शिवकुमार’सारख्या वरिष्ठांच्या पुरुषी अहंकाराला व जाचाला कंटाळून बळी पडलेल्या महिलांची संख्या ही कमी नाही.भविष्यातही यात फारसा फरक पडेल याची शास्वतीही वाटत नाही.मुळात जन्मापासून अभावात जीवन जगण्याचा वेदनादायी अनुभव, लिंगभेद गाठीशी असतानाही शिक्षण,नोकरी असो अथवा व्यवसाय.इथपर्यंत संघर्ष करून मिळवलेले यश असेल किंवा यातून सुखी समाधानी आयुष्याचे पाहिलेले माफक स्वप्न अशा विकृत वर्तनाच्या अधिकाऱ्यांमुळे क्षणात उधवस्त होणे आपल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

          दैनंदिन जीवनातील असंख्य समस्यांना सामोरे जात स्वबळावर उभ्या असलेल्या महिला आपल्या वृद्ध आईवडिलांचा,भावाबहिणींचा,पती-मुलांचा आधारही असतात.हे अशा मुजोर वृत्तीच्या अधिकाऱ्यांना कधी कळणार ? महिलांचे सक्षमीकरण करून त्यांच्या गुणवत्ता व कर्तृत्वाला अधिक संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असताना,त्यांच्या जगण्याच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटना निश्चितच भूषणावह नसून लज्जेने मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत.समाजात मिळणारी दुजाभावाची वागणूक,तुच्छ नजरा,असुरक्षितता,सरंजामी मानसिकता जपणाऱ्या अधिकाऱ्यांची नासकी प्रवृत्ती अशा घटनामधून वारंवार दृष्टीस येतात.

          पुरुषापेक्षाही कणभर अधिक जबाबदारीने वागून नोकरी करताना महिलांना कायम गृहीत धरले जात असते. निर्णय प्रक्रियेत सतत डावलण्याची मानसिकता अशा घटनांना जन्म देत असते.मत्स्यन्याय पद्धतीने प्रशासनात उच्चपदस्थ अधिकारी यशाचे श्रेय तर घेतात परंतु अपयशाचे धनी ठरवून मग कनिष्ठ किंवा महिला कर्मचाऱ्यांचा बळी देण्यात अग्रेसर असतात.एखादी महिला स्वकर्तृत्वाने,स्वाभिमानाने आणि स्वक्षमतेने यश मिळवत असेल तरीही पुरुषी अहंकार दुखावला जातो व त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो.यासाठी कार्यालयातील इतरांना या कार्यात साम,दाम,दंड,भेद यांचा वापर करून सहभागी करून घेतले जाते.अत्यावश्यक प्रसंगी रजा मान्य न करणे,वेतन कपात करणे,वेतन बंद करण्याची धमकी देणे,शिवीगाळ अथवा अपमानित करणे,कार्यालयात लॉबिंग करणे,अघोषित बहिष्कार टाकणे,वरिष्ठांचे कान भरणे,जातीयवादाचा आधार घेणे,बदनामी करणे,नकारात्मक वृतीणे वागणे,खोट्या तक्रारी-केसेस दाखल करणे,लोकांत गैरसमज निर्माण करणे यासारख्या कृत्यांतून वारंवार वेठीस धरले जाते.मग  अशा चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी महिला कर्मचारी हताश होऊन आत्महत्येसारख्या मार्गाला जवळ करतात.

          यातील विरोधाभास आणि दुर्दैव म्हणजे अशा छळ व पिळवणूकीस बळी पडणाऱ्या असंख्य महिलांना त्यांच्या  कुटुंबाकडून म्हणावा तसा पाठींबा किंवा मनोबल मिळत नाही.अनेकदा अशा छळाकडे कानाडोळा किंवा दुर्लक्ष करण्याचा सल्ला त्यांना दिला जातो.अनेक प्रकरणात आईवडील,भाऊ-बहिण,पती किंवा नातेवाईक यांचीही  उच्च पदस्थांकडे तक्रार न करता सहन करण्याची  मानसिकता,भूमिका दिसून येते.अथवा तक्रार करून फारसा फरक पडणार नाही अशी हतबलता नातेवाईकांमध्ये आढळते.पर्यायाने मग आत्महत्याच यातून आपली सुटका करू शकेल अशी मनोधारणा तयार होते.

          भविष्यात अशा ‘शीतल किंवा दिपाली’ प्रकरणाची पुनरावृत्ती टाळायची असेल तर अशा घटनांनतर समाज व शासन व्यवस्थेकडून कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे.कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ (प्रतिबंध,मनाई व निवारण) अधिनियम २०१३या कायद्याची प्रत्यक्षात प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. प्रत्येक विभागात ‘विशाखा समित्या’ स्थापन करून सक्षम केल्या पाहिजेत.महिलांच्या तक्रारी व चौकशीसाठी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे महत्वाचे आहे.या प्रक्रियेतून दोषींना त्वरित कठोर शासन झाले पाहिजे.कायद्याबरोबरच  सामाजिक वचक राहिला तरच महिलांची पिळवणूक अथवा छळ थांबेल.

          याशिवाय अशा नोकरदार महिलांचे मनोबल उंचावण्यासाठी समाजात तेवढेच आश्वासक व सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आपल्यावर आहेच.त्यांना निर्भय वातावरणात आपल्या कर्तव्याचे पालन करून स्वतःला सिद्ध करून राष्ट्र विकासात महत्वपूर्ण वाटा उचलण्याची संधी आपण कधी देणार ? भारतीय संस्कृतीतील पूजनीय नारीशक्तीचा सन्मान आपण करणार की तिला विकृतीमुळे वारंवार जीवनच संपवावे लागणार हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत राहणार आहे.

No comments:

Post a Comment